पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (नोव्हेंबर ८, इ.स. १९१९ - जून १२, इ.स. २०००) हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथा व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जायचे. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात. लेखक आणि कवी वामन मंगेश दुभाषी ऊर्फ ऋग्वेदी हे पु.ल.देशपांड्यांचे आजोबा होते तर आणि सतीश दुभाषी हे मामेभाऊ आहेत.
जीवन
गावदेवी, मुंबईत जन्मलेले पु ल. ऊर्फ भाई, पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात शिकले. ४० च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी शाळेमध्ये शिक्षक या नात्यानेही काही काळ काम केले. ते १९४६ साली सुनीताबाईंशी विवाहबद्ध झाले.
मराठी साहित्य व संगीतातील उत्तुंग योगदानाव्यतिरिक्त पु.लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे. ते उत्तम संवादिनी वादक होते, तसेच त्यांनी काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले.
बालपण आणि शिक्षण
पु.ल. देशपांडे यांचे वडील हे ’अडवाणी कागद कंपनी‘त दीडशे रुपये पगारावर फिरते विक्रेते होते. फिरतीवर असताना जेवणाखाण्याचा भत्ता मिळे. एकदा कोल्हापूरला असताना ते बहिणीकडे जेवले. त्यादिवशी त्यांनी भत्ता घेतला नाही. अशा तत्त्वनिष्ठ आणि सज्जन घरात पु.ल. जन्मले.
पु.ल. देशपांडे लहानपणापासूनच धष्टपुष्ट होते. वयाच्या दुसर्या वर्षी ते पाच वर्षांच्या मुलाएवढे दिसत. मात्र ते अतोनात हुशार होते. सतत काही ना काही करत असत. त्यांना स्वस्थ बसण्यासाठी घरचे लोक पैसा देऊ करायचे, पण हे पैसे त्यांच्या नशिबात नसत. आजोबांनी लिहून दिलेले आणि पु.लं.नी पाठ केलेले दहा-पंधरा ओळींचे पहिले भाषण पु.लं.नी वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या शाळेत हावभावासहित खणखणीत आवाजात म्हणून दाखवले. अशी भाषणे सात वर्षे चालली. त्यानंतर मात्र, वयाच्या बाराव्या वर्षापासून पु.ल. देशपांडे स्वतःची भाषणे स्वतःच लिहायला लागले, इतकेच नव्हे तर इतरांनाही भाषणे आणि संवाद लिहून देऊ लागले.
आपल्या घरात पु.ल. देशपांडे यांना खूप वाचन करायला आणि रेडिओवरील संगीत ऐकायला मिळाले. शिवाय त्यांच्या घरी संगीताच्या बैठका होत असत. ते घरीच बाजाची पेटी शिकले. टिळक मंदिरात एकदा बालगंधर्व आले असताना पु.लं.नी त्यांना पेटी वाजवून दाखवली. बालगंधर्वांनी शाबासकी व भावी कलाजीवनासाठी शुभेच्छा दिल्या. लोकांच्या वागण्यातील विसंगती आणि हास्यास्पद गोष्टी हेरून पु.ल. त्या लोकांच्या नकला करायचे, म्हणून घरी कुणी आले असताना पुरुषोत्तम जवळ नसलेलाच बरा असे आईला वाटे. पु.ल. देशपांड्यांची आई कारवारी, वडील कोल्हापूरचे आणि बहीण कोकणात दिलेली, त्यामुळे घरात भोजनात विविधता असे. यातूनच पु.ल. खाण्याचे शौकीन झाले.
वडिलांच्या मृत्यूमुळे पु.ल.देशपांडे गाण्याच्या, पेटीच्या व अन्य शिकवण्या करू लागले. ते शाळेत असल्यापासूनच भावगीते गायचे आणि गीतांना चाली लावायचे. कॉलेजात असताना त्यांनी राजा बढे यांच्या ’माझिया माहेरा जा‘ या कवितेला चाल लावली. आज ते गाणे मराठी भावसंगीतातला अनमोल ठेवा आहे. ग.दि. माडगूळकरांनी लिहिलेल्या आणि भीमसेन जोशींनी गायलेल्या ’इंद्रायणी काठी‘ला पु.लं.नी चाल लावली होती. हेही गाणे अजरामर झाले.
कॉलेजमध्ये असताना पु.ल. गायकांना साथ करीत. पु.ल. पेटी वाजवत, त्यांचा भाऊ रमाकांत तबला आणि मधुकर गोळवलकर सारंगी वाजवीत. मिळालेले १५ रुपये तिघेही वाटून घेत. पार्ले टिळक विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पु.ल., मुंबईतील इस्माईल युसुफ कॉलेजातून इंटर व सरकारी लॉ कॉलेजमधून एल्एल.बी. झाले, आणि कलेक्टर कचेरी व प्राप्तीकर विभागात काही काळ नोकरी करून पुण्याला आले. त्यापूर्वी ते पेट्रोल रेशनिंग ऑफिसमध्ये कारकून आणि ओरिएंटल हायस्कूलमध्ये शिक्षक होते. पुण्याला आल्यावर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए.आणि नंतर एम.ए. केले.
चित्रपटसृष्टीत पदार्पण
१९४७ ते १९५४ या काळात ते चित्रपटात रमले. ’वंदे मातरम्‘, ’दूधभात‘ आणि ’गुळाच्या गणपती‘त ते त्यांच्या अष्टपैलू कामगिरीने प्रसिद्धीस आले. म्हणजे चित्रपटाचे कथा, पटकथा, काव्य, संगीत, भूमिका आणि दिग्दर्शन सर्वच पुलंचे असे.
१९४७सालच्या मो.ग.रांगणेकरांच्या ’कुबेर‘ या चित्रपटाला संगीत देऊन पु.ल.देशपांडे संगीत दिग्दर्शक झाले. चित्रपटातील गाणी त्यांनी म्हटली होती. आता ते पार्श्वगायकही झाले होते. वंदे मातरम्मध्ये पुल व त्यांच्या पत्नी सुनीताबाई यांच्या प्रमुख भूमिका होत्या. पु.ल. गायक असलेले नायक होते. त्या भूमिकेमुळे पु.ल. चित्रपटअभिनेते झाले. पु.ल.देशपांडे यांचा ’देवबाप्पा’ चित्रपटसृष्टीत अविस्मरणीय ठरला. ’नाच रे मोरा’ हे अवीट गोडीचे गाणे अजूनही मुलांचे आवडते गाणे आहे. ’पुढचं पाऊल‘ या चित्रपटात त्यांनी ’कृष्णा महारा‘ची भूमिका केली, आणि ते अभिनयसंपन्न नट म्हणून प्रसिद्धीस आले.
उल्लेखनीय
- दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते.
- साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी या दोहोंचे पुरस्कार मिळवणार्या मोजक्या प्रतिभावंतात पुलंचा समावेश होतो.
- मुंबईच्या ’नॅशनल सेंटर फॉर परर्फॉर्मिंग आर्ट्स‘ (NCPA) या संस्थेत पुलंनी अनेक प्रयोग केले. संशोधकांना आधारभूत होतील असे असंख्य संदर्भ, कलांचा इतिहास, ध्वनिफिती, मुलाखती, लेख आदी बरेच साहित्य पु.लंनी जमा करून ठेवले आहे. मराठी नाटकाचा आरंभापासूनचा इतिहास त्यांनी अशा जबरदस्त प्रयत्नान्ती जमा केला की त्यांच्यावरून स्फूर्ती घेऊन भारतातील अनेक जणांनी त्यांच्या त्यांच्या प्रांतांतील कलांचा इतिहास जमा करून नोंदवायची सुरुवात केली. NCPAच्या रंगमंचावर पु.ल.देशपांडे यांनी देवगाणी, बैठकीची लावणी, दोन पिढ्यांची गायकी असे काही अनोखे कार्यक्रम सादर केले.
- पु.ल. भाषाप्रेमी होते. त्यांना बंगाली, कानडी येत असल्याने ते त्या त्या समाजातील लोकांत सहज मिसळत.
Comments
Post a Comment